काय घडतं तुम्ही एक गाव सोडता..?
जागा तेवढी बदलते, पण तुम्ही..?
तुम्ही तेच असता, आधीही अन् आताही.
माणसे भले बदलत असतील आजूबाजूचे
पण तुम्ही माणूस इथे हि तेच असता..!
आधीच्या लोकांना परिचीत असलेले,
तुमचे गुण-अवगुण इथे नव्याने जाणवतात.
आधी कुणी केलेली प्रशंसा नव्याने भेटते
तुमचा एखादा दुर्गुण पुन्हा ऐकायला मिळतो
फार काही बदलत नाही तुम्ही तेच असता..!
बाह्यपक्षी खरंच फार काही बदलत नाही,
कारण तुम्ही तेच असता... मात्र,
आतून कुठे काहीतरी तुटताना जाणवते.
वाटेवरची झाडे मागे पडावीत तशी,
एक-एक माणसे मागे पडत जातात.
अंधाऱ्या रात्री चांदण्याने सोबत करावी,
तशा आठवणी सदैव साथ करतात.
नवीन जागा,लोक अन् नवीन उत्साह,
नव-नवीन सगळीच नवलाई...
जेव्हा नव्याने कुणीतरी प्रशंसा करणार,
ते शब्द बोलणारा जुना सखा मात्र आठवणार.!
एखाद्या टोमण्याचा राग येण्या ऐवजी,
तसेच बोलणारा जुना दोस्त आठवणार..!
काय घडतं तुम्ही एक गाव सोडता..?
जागा आणि जग ही बदलत गेले...
तरी आठवणींची नाळ तुटत नाही,
सुटला गाव जरी, नातं तुटत नाही..!
©सचिन नानासाहेब खैरनार
